श्री.अनघा-दत्त देवस्थान
दीर्घायु फार्म्स
श्री.श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी
जन्म: भाद्रपद शुद्ध ४, गणेश चतुर्थी, शके १३२०, पिठापूर, आंध्रप्रदेश
आई/वडील: सुमती महाराणी /अप्पलराज शर्मा
निवास क्षेत्र: कुरगड्डी (कुरवपूर) (कर्नाटक राज्य)
संप्रदाय: दत्तावतारी
वेष: ब्रम्हचारी
कार्यकाळ: १३२० -१३५०
समाधी: अवतार समाप्ती अश्विन वद्य १२ शके १३५०, कुरवपूर
चरित्र ग्रंथ: श्रीपाद चरित्रामृत
श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या अवतार कार्याचे कारण असे आहे की, जगामध्ये कलियुगामुळे विपरित ज्ञान वाढू लागले. याच्या परिणामाने आत्म ज्ञान प्राप्तीच्या मार्गावर अंधळा आणि बहिरा असल्या प्रमाणे भक्तांची अवस्था होउन कोणास काहीच कळेनासे झाले. पापाचा आणि दुराचरणाचा भार भूमीवर वाढू लागला. या भक्तांना गुरु-शिष्य परंपरेच्या आधारे उपासनेचे मार्ग दर्शन होउन त्या द्वारे गुरुप्रसादाचा लाभ होउन कैवल्य पद मिळावे म्हणून, परम् कृपाळु श्री दत्तात्रेय-अवधूत महाराजांनी जनांचा उद्धार करण्यासाठी आणि भूमीभार उतरविण्यासाठी श्रीपाद नावाने नर वेष धारण केला.
या कलियुगामाझारीं । ज्ञान जाहले मूढापरी । कांहीं नेणती अंधबधिरीं | मायापाशें वेष्टोनियां || २२२ ||
लाधे ज्यासी गुरुप्रसाद | त्यासी प्राप्त होय कैवल्यपद | दूरी होईल कामक्रोधमद | साध्य होईल पद-अच्युत || २२४ ||
भूमीभार उतरावया । जन्म धरिला श्रीपाद राया । दत्तात्रेय-अवधूतरायें । वेष धरिला नरदेहीं || २२६ ||
इ. स. १३२० मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पीठापूर नावाच्या गावात आपळराज नावाचा एक आपस्तंभ शाखेचा ब्राम्हण होता. त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमती. ती मोठी सदाचरणी व पतिव्रता होती. अतिथी-अभ्यान्गताची ती मनोभावे सेवा करीत असे. दोघेही सत्वगुणी होते. ती श्रीविष्णूची आराधना-उपासना करीत असे. एके दिवशी मध्यान्हकाळी श्रीदत्तात्रेय अतिथीवेषात तिच्या घरी भिक्षेसाठी आले. त्या दिवशी अमावस्या होती. त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध होते. श्राद्धा साठी बोलाविलेले ब्राम्हण अद्याप यावयाचे होते. दारी आलेला अतिथी आलेला आहे हे पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करून त्याला श्राद्धा साठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा वाढली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिथीवेषातील श्रीदत्तात्रेयांनी तीन शिरे, सहा हात अशा स्वरुपात दर्शन दिले. आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला. तिने श्रीदत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार घातला. प्रसन्न झालेले श्रीदत्तात्रेय तिला म्हणाले,
“माग माते जे इच्छिसी । जे जे वासना तुझे मन पावसी । पावसी त्वरित म्हणतसे॥
“माते, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला जे हवे असेल ते माग.”
श्रीदत्तात्रेयांनी असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्तप्रभूंना म्हणाली, “भगवंता, आपण मला ‘जननी’ म्हणालात तेव्हा ते नाव सार्थ करावे. माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा. मला पुष्कळ पुत्र झाले, परंतु ते जगले नाहीत. त्यातून दोन पुत्र वाचले आहेत, पण त्यातील एक आंधळा आहे व दुसरा पांगळा आहे. ते असून नसल्यासारखे आहेत, म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य, परमज्ञानी, देवस्वरूप असा पुत्र व्हावा.” सुमतीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले श्रीदत्तप्रभू पुढील धर्मकार्याचे स्मरण होऊन तिला म्हणाले, “माते, तुला मोठा तपस्वी पुत्र होईल. तुझ्या वंशाचा उद्धार करील. कलियुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल. परंतु तो तुम्हाला सांगाल तसे करा. नाहीतर, तो तुमच्याजवळ राहणार नाही. तुमचे सगळे दैन्य-दुःख दूर नाहीसे करेल.” असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथीरुपी श्रीदत्तात्रेय अदुष्य झाले. हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला.
काही कामासाठी बाहेर गेलेला आपळराजा घरी परतला. सुमतीने त्याला सगळी हकीगत सांगितली. मध्यान्हकाळी कोणी अतिथी आल्यास त्याला भिक्षा घालण्यास चुकू नको, असेही श्रीदत्तात्रेयांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे माहूर, करवीर, पांचाळेश्वर या ठिकाणी श्रीदत्तात्रेयांचा निवास असतो आणि जे कोणी भिक्षा मागावयास येईल त्याला श्रीदत्तप्रभू मानून भिक्षा घालावी असेही त्यांनी सांगितले होते. सुमतीने सांगितलेली हकीगत ऐकून आपळराजा अतिशय आनंदित झाला. तो सुमतीला म्हणाला, “तू अगदी योग्य तेच केलेस. आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफल झाले. माझे पितर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले. कारण आज आपल्याकडे श्रीदत्तरुपी प्रत्यक्ष विष्णूच आले होते. हे सुमती, तुझे मातापिता खरोखर धन्य आहेत. तुला जो वर मिळाला तसाच पुत्र तुला होईल. पुढे यथा काळी सुमती गर्भवती झाली. नवमास पूर्ण झाल्यावर एका शुभदिवशी (भाद्रपद शुक्ल चतुर्थी) सुमती प्रसूत झाली. तिला एक पुत्र झाला. त्याचे जातकर्म करण्यात आले. आपळराजाने खुप दानधर्म केला. विद्वान ब्राम्हणांनी त्याची जन्मपत्रिका तयार करून त्याचे भविष्य वर्तवले. ‘हा मुलगा दीक्षाकर्ता, जगद्गुरु होईल.’ असे त्याचे भविष्य सांगितले. भगवान दत्तात्रेयांनी वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला, हे ध्यानात घेऊन त्या नवजात बालकाचे नाव ‘श्रीपाद’ असे ठेवले. हे भगवान दत्तात्रेय असून लोकोद्धारासाठी अवतीर्ण झाले आहेत हे आपळराजा व सुमती यांने समजले. अत्यंत आनंदाने ते श्रीपादाचे संगोपन करीत होते.
यथावकाश श्रीपाद सात वर्षांचा झाला. मग आपाळराजाने त्याचे यथाशास्त्र मौजीबंधन केले. मुंज होताच श्रीपाद चारही वेद म्हणू लागला. तो न्याय, मीमांसा, तर्क इत्यादी दर्शनशास्त्रांत पारंगत झाला. त्यावर भाष्य करू लागला. आचारधर्म, व्यवहारधर्म, प्रायश्चित्ते, वेदांत इत्यादींचे ज्ञान तो लोकांना समजावून देऊ लागला. श्रीपादाची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क झाले. त्याच्या मुखातून आलेले ज्ञान श्रवण करण्यासाठी लोक पीठापुरास येऊ लागले. श्रीपाद सोळा वर्षांचे झाले. माता-पित्यांनी श्रीपादांच्या विवाहाबद्दल चर्चा सुरु केली. त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी विचारले, त्यावेळी ते म्हणाले, “मी विवाह करणार नाही. मी वैराग्य स्त्रीशी विवाह केला आहे. मी तापसी ब्रम्हचारी, योगश्री हीच आमची पत्नी होय. माझे नावच श्रीवल्लभ आहे. मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे.” हे ऐकून आई-वडिलांना खूप वाईट वाटले. परंतु ‘तुला ज्ञानी पुत्र होईल. तो सांगेल तसे वागा.’ हे श्रीदत्तप्रभूंचे शब्द सुमतीला आठवले. या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल तेव्हा याला अडवून चालणार नाही. असा विचार करून आई-वडील त्यांना म्हणाले, “बाळा, तू आमच्या म्हातारपणी आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती. पण आम्ही तुला अडवीत नाही.” आपल्याला पुत्रवियोग होणार या विचाराने सुमती दुःख करू लागली. तेव्हा श्रीपाद तिला समजावीत म्हणाले, “तुम्ही कसलीही चिंता करू नका. तुम्हाला हवे असेल ते मिळेल.” मग त्यांनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूंकडे अमृतदृष्टीने पहिले. आणि त्याचक्षणी परिस्पर्शाने लोखंडाचे सोने होते, त्याप्रमाणे त्या दोघा भावांना दिव्य देह प्राप्ती झाली. आंधळ्याला दृष्टी आली व पांगळ्याला पाय आले. त्या दोघांनी श्रीपादांच्या चरणकमलांवर डोके ठेवले. ‘आम्ही आज कृतार्थ झालो, धन्य झालो.’ असे ते म्हणाले. श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला.
“तुम्हाला पुत्रपौत्रांसह सर्वप्रकारची सुखसमृद्धी प्राप्त होईल . तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल. तुम्ही चिरकाल सुखाने नांदाल. तुम्ही आई-वडिलांची सेवा करा. तुम्ही परमज्ञानी व्हाल. शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल.” मग ते आई-वडिलांना म्हणाले, “या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शतायुषी व्हाल. आता मला परवानगी द्या. मी उत्तरदिशेला जात आहे. अनेकांना मी दीक्षा देणार आहे.” सर्वजण श्रीपादांच्या पाया पडले. श्रीपाद श्रीवल्लभ घरातून बाहेर पडले आणि एकाकी गुप्त झाले.
पिठापुरम येथे १६ तर कुरवपूर येथे १४ वर्षे अशा अवघ्या ३० वर्षांच्या कालावधीत अद्भूत असे लीलाचरित्र दाखवून त्यांनी इह-पर लोकातील सर्वांना शाश्वत सुख प्रदान केले. त्यांच्या बाललीला प्रत्यक्ष भगवान बालकृष्णाच्या लीलेसारख्या अत्यंत मधुर आणि अद्भूत आहेत. पुढे जप, तप, ध्यान, तपस्या या सर्वांचे फल स्वत:ला न घेता सृष्टीला देत आपल्या भक्तांची सुटका करण्यासाठी त्यांनी आपले तपोबळ सहस्त्रपटीने वाढविले. आपल्या दिव्य अगम्य आणि मानवाच्या दृष्टीने अनाकलनीय असलेल्या लीलांद्वारे जनता जनर्दानाच्या उद्धारासाठी त्यांनी आपले आयुष्य घातले. पाण्यावरून चालणे, व्यंग व्यक्तीस अव्यंगता प्राप्त होणे, उपस्थितांसाठी शिजवलेले अन्न कमी असूनही ते सर्वांना पुरून शिल्लक राहणे, लांबच्या प्रवासातही दूध, दही, लोणी खराब न होता नीट राहणे, अंध व्यक्तीस दृष्टी प्राप्त होणे, मृत जीवास जीवनदान देणे अशा कितीतरी प्रकारच्या चमत्कृतीपूर्ण लीलांनी त्यांचे आयुष्य भरलेले दिसते. या दिव्य लीलांच्या प्रकटनातून प्रामुख्याने संत-सज्जनांचे संरक्षण, कर्ममार्गाचे आचरण, गर्वहरण, दृष्टांचे निर्दालन, अस्पृश्यता निवारण, सत्कर्माचे प्रचारण, भूदान व अन्नदानाचे महत्त्व, नामस्मरणाचा महिमा, भूत-पिशाच्च बाधांचे निर्मूलन आदि अनेक गोष्टींचा संदेश दिला. आंध्र प्रदेशातील पीठापुरम येथे या दैवी बालका ने बालवयात म्हणजे सोळाव्या वर्षाच्या आतच सकळ शास्त्रात विशेषत: वेदांत प्रावीण्य मिळविले. नंतर समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी भारत भ्रमण केले.